राजकिय जीवन

आमदार म्हणून त्यांची कर्तव्ये त्यांनी चोख बजावली. आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी विधानसभेत केले. तेथे त्यांनी अनेक प्रश्नांना हात घातला. सातपुड्यात स्वतः पायी फिरुन कार्य करीत असल्याने आदिवासींच्या अडचणींची त्यांना पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी संबंधीत मंत्र्यांना अनेकदा धारेवर धरले व निरुत्तर केले. महु व टोळंबीच्या झाडांच्या कत्तलींचा किस्सा सर्वश्रूत आहे. आदिवासी समाजातील लोक महुपासून दारु बनवितात व चोरटी विक्री करतात असा आरोप करुन सरकारने सातपुड्यातील सर्व महुची झाडे तोडावी परंतू तेल मिळत असलेल्या टोळंबीचे झाड तोडू नये असा आदेश केला होता. त्यावर मा.जनार्दन महाराज यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री श्री.मोरारजी देसाई यांना पत्र लिहून महु व टोळंबीचे झाड एकच असते असे कळविले. तेव्हा ती वृक्षतोड बंद झाली.
एकदा त्यांनी सातपुड्यातील आदिवासी दुष्काळ परिस्थीतीमूळे ढेप खाऊन जीवन जगत आहेत त्याबाबत सरकारला जाब विचारला तेव्हा संबंधीत मंत्र्याने “आदिवासींमध्ये ढेप खाण्याची प्रथा आहे” असे सांगितले. या उत्तराने व्यथीत होऊन त्यांनी त्यापुढे कधीही राजकिय निवडणूक न लढण्याचा व कोणालाही राजकारणात मदत न करण्याचा निर्धार त्यांनी केला व आजतागायत ते त्या निर्धाराला जपून आहेत. परंतु त्यांचे पुर्वाश्रमीचे मित्र मा. सुरुपसिंगजी नाईक, मा.मधुकरराव चौधरी, मा.मधुकरराव पिछड़ मा. अण्णासाहेब पी.के.पाटील, मा.व्यंकटराव रणधिर तसेच मा.माणिकराव गावित, मा.विजयकुमार गावित, मा.पद्माकर वळवी व मा.के. सी. पाडवी या सर्वांचे सहकार्य त्यांना आजही लाभत आहे.
Comments